नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील जनतेचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. बँकांबाहेर मोठ-मोठ्या रांगा असल्याने अनेकांना एटीएमचा आधार होता. मात्र, एटीएममध्येही खडखडाट पाहायला मिळतोय. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोय. वाराणसीतील जनतेने एटीएममधील खडखडाटाविरोधात अनोखं आंदोलन केलं.


वाराणसी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ. मात्र, वाराणसीतील अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. ‘सुबह-ए-बनारस’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शंखनाद करत एका एटीएमची आरती केली आणि आनोख्या पद्धतीने एटीएममधील खडखडाटाविरोधात निषेध नोंदवला.



केंद्र सरकारने किमान एटीएममध्ये पैसे उपलब्ध करुन द्यावेत, अशी या संस्थेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. एटीएममधूनही पैसे मिळत नसल्याने लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी आणि व्यापाऱ्यांना व्यापारासाठी पैशाची कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार वाराणसीतील या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.