मुंबई : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची बाजू घेणाऱ्या नेत्यांचा 'नोबेल'चे मानकरी कैलास सत्यार्थी यांनी निषेध व्यक्त केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूरसारखी माणसं महात्मा गांधींच्या आत्म्याची हत्या करत असल्याच्या संतप्त भावना सत्यार्थी यांनी ट्विटरवरुन बोलून दाखवल्या.


'नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली, मात्र प्रज्ञासारखी माणसं त्यांच्या आत्म्याच्या हत्येसोबतच अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याचे प्राण घेत आहेत. गांधी प्रत्येक सत्ता आणि राजकारणापेक्षा वर आहेत. छोट्याशा फायद्याचा मोह सोडून भाजप नेतृत्वाने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी आणि राजधर्माचं पालन करावं', असं सत्यार्थींनी सुचवलं.


महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञाला क्षमा नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त केला होता. यंदाच्या निवडणूक काळात साध्वी प्रज्ञाने दुसऱ्यांदा वादग्रस्त वक्तव्य करत जनक्षोभाला निमंत्रण दिलं.

Sadhvi Pragya Apology | नथुराम गोडसेबद्दलच्या विधानावरुन वाद, साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा |


काय होतं प्रकरण?

मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञाने प्रत्युत्तर दिलं. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते. यावर साध्वी प्रज्ञा सिंहची प्रतिक्रिया विचारली असता 'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने केलं होतं.

नथुराम गोडसे देशभक्त, साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याने पुन्हा वाद

साध्वीचा माफीनामा

सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहने माफीनामा मागितला. "मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादाशी संबंधित प्रश्न मला विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो. गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जे पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत."

नथुराम गोडसेबद्दलच्या विधानावरुन वाद, साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा

भाजपने हात झटकले

साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्यावरुन जोरदार टीका होत आहे. वाद वाढल्यानंतर भाजपचे जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले की, "साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो. पक्षाने तिच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. साध्वीने तिच्या वक्तव्या प्रकरणी सार्वजनिकरित्या माफी मागावी."

विरोधकांचा हल्लाबोल

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "बापूंचा मारेकरी देशभक्त? हे राम!. असं प्रियांका गांधी ट्विटरवर म्हणाल्या.

भोपाळमध्ये साध्वीविरोधात लढणारे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी प्रज्ञाच्या विधानावर पतंप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी केली.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही टीका केली आहे. "जर गोडसे देशभक्त आहे तर गांधींजी देशद्रोही होते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोण होता नथुराम गोडसे?

नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथीदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.

त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.

हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला, साध्वी प्रज्ञांचं वादग्रस्त विधान

कोण आहे साध्वी प्रज्ञा?

संपूर्ण नाव - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
मूळ गाव - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कछवाहा
रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर तिने संन्यास घेतला. ती अभिनव भारत संघटनेची सदस्य आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ती आरोपी होती. स्फोटाच्या ठिकाणी तिची बाईक सापडली होती. त्यानंतर तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. 2016 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंहला दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. तिच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूरवर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असं सांगण्यात आलं.

संघ प्रचारक आणि  समझोता एक्स्प्रेस स्फोटातील आरोपी सुनिल जोशी हत्याप्रकरणातही साध्वी प्रज्ञाचं नाव होतं. पण 2017 मध्ये मध्य प्रदेशातल्या देवास कोर्टाने प्रज्ञाला सुनील जोशी हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं होतं.

हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य काय?

'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.' या साध्वीच्या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी साध्वीला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. 'माझ्या वक्तव्याचा देशाच्या शत्रूंना फायदा होत असल्याचं मला वाटतं. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेऊन माफी मागते' अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने माफी मागितली होती.

संबंधित बातम्या :

साध्वी प्रज्ञा यांच्याकडे 4 लाख रुपयांची संपत्ती, चांदीचं ताट, चार ग्लास आणि कमंडलू!

लोकसभा उमेदवारीविरोधातील याचिकेवर प्रज्ञा सिंह आणि एनआयएचं कोर्टात उत्तर

साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका