नवी दिल्ली : पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे, तर केवळ मारहाणीप्रकरणी दोषी ठरवलं. यामुळे त्यांचा तुरुंगवास टळला आहे.


काय आहे प्रकरण?

रोडरेज प्रकरण हे 27 डिसेंबर 1988 रोजीचं आहे. सिद्धूवर आरोप आहे की, पंजाबच्या पटियालामध्ये 65 वर्षीय गुरनाम सिंह यांना रस्त्यावर मारहाण केली होती. यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणाची सुनावणी करताना पटियालाच्या सत्र न्यायालयाने 22 सप्टेंबर, 1999 रोजी सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदर सिंह संधू यांची पुराव्याअभावी सुटका केली होती.

पण पीडिताच्या कुटुंबियांनी या निर्णयाविरोधात पंजाब आणि हरियाणा कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सिद्धू यांना भारतीय दंडविधान कलम 304 अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

शिक्षेविरोधात नवज्योतसिंह सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने 2007 मध्ये दोघांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यामुळे सिद्धू यांना अमृतसरमधून निवडणूक लढवता आली.