पटियाला (पंजाब) : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. बनावट पदवी प्रमाणपत्रप्रकरणी त्यांच्याविरोधातील तक्रार कोर्टाने रद्द केली.  इराणी यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे कारण  बनावट पदवी प्रमाणपत्रप्रकरणी विरोधी पक्षाने इराणी यांना चांगलेच धारेवर धरले होते.


कोर्टाने या प्रकरणी इराणी यांना समन्स पाठवण्यास नकार दिला तसेच इराणी यांच्याविरोधात 11 वर्षानंतर तक्रार करण्यात आली आहे असं म्हणत कोर्टाने तक्रारकर्त्याबाबत शंका उपस्थित केली आणि केंद्रीय मंत्र्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार कऱण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलं.

इराणींच्या एप्रिल 2004 च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या शपथपत्रात दिल्ली विद्यापीठातून 1996 मध्ये बी.ए., 2011 च्या राज्यसभा निवडणूक शपथपत्रात दिल्ली विद्यापीठातून बी. कॉम. तर 2014 च्या लोकसभा निवडणूक शपथपत्रात येथूनच बी. कॉम. पार्ट-1 पूर्ण केल्याचे म्हटले होते, त्यावरून त्या वादात सापडल्या होत्या.