नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सावध भूमिका घेतली आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध कधीही युद्ध सुरु करणार नाही, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.


आम्ही भारतासोबत युद्ध सुरु करणार नाही. पाकिस्तान आणि भारत दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढला तरी आम्ही आधी अण्वस्त्राचा वापर करणार नाही. दोन्ही देशांमधील तणावाचा संपूर्ण जगाला धोका आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं.





युद्धाचा दोन्ही देशांना धोका

युद्ध कोणत्याही समस्येचं समाधान असू शकत नाही. युद्ध जिंकणाऱ्या देशालाही खुप काही गमवावं लागतं. याशिवाय युद्धानंतर अनेक समस्यांचा जन्म होता, असं त्यांनी म्हटलं. लाहोरमध्ये शीख समुदायांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.


जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठीची कराचीची हवाई हद्द बंद केली आहे. भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील एका वर्तमानपत्रात लेख लिहून अण्विक युद्धाची त्यांनी धमकी दिली होती. तसेच काश्मीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अन्यथा युद्धाची स्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.


संबंधित बातम्या