श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत कुपवाडा परिसरात गोळीबार केला. पाकिस्तानच्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराच्या एका पोस्टचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय दोन घरं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे. तीन नागरिक या गोळीबारात जखमी झाले आहेत.


जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य भारतात घुसणाऱ्या घुसखोरांना मदत करत होते. त्यादरम्यान झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवानांचा मृत्यू झाला. भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जात आहे.


पाकिस्तानने 15 ऑक्टोबरलाही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावेळीही भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावर्षी पाकिस्तानने आतापर्यंत 2300 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा 1629 होता.


भारतीय लष्करानुसार, शस्त्रसंधीचं उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी हेतून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यंना नियंत्रण रेषेजवळ थांबवण्यात येतं. जेणेकरुन जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारतात घुसखोरी करता येईल.