पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 7 पाक रेंजर्सचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2016 07:21 AM (IST)
UPDATE : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मूच्या आरएसपुरा, राजौरी भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. UPDATE : जम्मू पोलिसांनी एका पाकिस्तानी हेरला पकडले असून, त्याच्याकडून दोन पाकिस्तानी सिमकार्ड आणि फोन जप्त केले आहेत. श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी रात्री जम्मूतील आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मूचे उपायुक्त सिमरनदीप सिंह यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सकडून आरएसपुरा सेक्टरमध्ये अब्दुलियान गावात गोळीबार केला गेला. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, "पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. काही तासांआधीही पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावेळीही जशास तसं प्रतुत्तर देत सात पाकिस्तानी रेंजर्स आणि एका दहशतवाद्याचा भारतीय जवानांनी खात्मा केला. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी कठुआमधील हिरानगरमध्ये भारतीय चौकींवर सकाळी 9.35 च्या सुमारास स्नायपर अटॅक केला. मात्र, भारतीय जवानांनी या गोळीबाराला जशास तसे उत्तर दिले. या गोळीबारात पाकिस्तानचे 7 रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाला. पाकिस्तानी रेंजर्सच्या हल्ल्यात भारतीय कॉन्स्टेबल गुरनाम सिंह जखमी झाले. त्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. गुरनाम सिंह यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना जम्मूस्थित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.