पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2017 02:41 PM (IST)

नवी दिल्ली : नजरचुकीनं 29 सप्टेबरला पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची आज पाकिस्ताननं सुटका केली. आज वाघा बॉर्डरवर पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी चंदू यांना भारतीय लष्कराकडे सुपूर्द केलं. चंदू मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. ते जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदू यांनी चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर ते पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले होते. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं. चंदू यांच्या सुटकेचं वृत्त समजताच तिकडं बोरविहीर गावात नातेवाईक आणि मित्रांनी जल्लोष केला. चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाण यांची सुटका केली आहे. “कुठल्याही परिस्थितीत चंदू चव्हाण यांना भारतात परत आणणार”, असा काही दिवसांपूर्वीच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी निर्धार व्यक्त केला होता. कोण आहेत चंदू चव्हाण? चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत. https://twitter.com/ANI_news/status/822729565202063361 https://twitter.com/PTI_News/status/822732461452959744