India Vs Pakistan War: भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये भीतीचे वातावरण आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी गुरुवारी संकेत दिले की जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते.सुरक्षेच्या परिस्थिती लक्षात घेता, नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक मदरशांना 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय आक्रमण झाल्यास अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. आपत्कालीन निधीत एक अब्ज रुपये पाठवण्यात आले आहेत. तसेच, हॉटेल्स, गेस्टहाऊस मालकांनी त्यांच्या मालमत्ता सैन्याला देऊ केल्या आहेत. काल (गुरुवारी) अधिकाऱ्यांनी नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील इतर संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरून परत पाठवण्यात आले. लिपा व्हॅलीमधील रहिवाशांना नियंत्रण रेषेजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे आणि सुरक्षा एजन्सींना सहकार्य करण्यास सांगितले आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे सरकारने मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून लक्ष्य करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. कायदा मंत्री मियां अब्दुल वाहिद यांनी सांगितलं की, "आपण एका चलाख, निर्दयी आणि कट रचणाऱ्या शत्रूशी सामना करत आहोत ज्याच्या नापाक कृत्यांची शक्यता नाकारता येत नाही."
विमान सेवांवरही निर्बंध
मे महिन्यात कराची आणि लाहोर हवाई हद्दीतील विमान वाहतूक दररोज 8 तासांसाठी (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत) बंद ठेवण्यात आली आहे. यासोबतच गिलगिट-बाल्टिस्तानमधील विमानसेवांवरही परिणाम होत आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील हवाई क्षेत्र आधीच बंद आहे, ज्यामुळे इस्लामाबाद ते गिलगिट-स्कर्दूला जाणारी उड्डाणे सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. शिवाय, खराब हवामानामुळे इस्लामाबादमधील पाच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे उशिराने किंवा इतर शहरांमध्ये वळवण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वर-उल-हक यांनी विधानसभेत सांगितले की, आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहोत. भारतीय सैन्याकडून गोळीबार होत आहे, ज्यामुळे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय सैन्याने ऑपरेशन केलं सुरू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनेक स्थानिक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.या हल्ल्यात अनेक स्थानिक दहशतवादीही सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्करानेही नियंत्रण रेषेवर हालचाली तीव्र केल्या आहेत. घुसखोरीच्या प्रयत्नात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.