नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून पाकिस्तानी रेंजर्संकडून भारतीय सीमारेषेवर गोळीबार करण्यात येत आहेत. या गोळीबारात आत्तापर्यंत 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सीमारेषेवरील या चकमकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक घेतली असून या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar abdullah) हेही उपस्थित होते. त्यामध्ये, सीमारेषेवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावं, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या असून बंकर तयार करण्याचेही सूचवले आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत असून ओमर अब्दुल्ला आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal malik) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय सीमारेषेवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण तयार असल्याचे सांगत, सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. जिथे जिथे नागरिकांना हलविण्याची आवश्यकता असेल, तिथे तिथे हलविण्यात येईल. आमच्या हातात हा खेळ नाही, असे प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली. या हल्ल्याची सुरुवात पहलगाम येथून झालीय. पहलगाममध्ये निष्पाप 26 भारतीय पर्यटकांना ठार मारण्यात आले. त्यावेळी, भारताने इशारा दिला होता, हल्ल्याचे उत्तर देणार. त्यानुसार, भारताने हल्ल्याचं उत्तर दिलं आहे, आम्ही पाकिस्तानमधील नागरिक आणि सैन्य दलाच्या ठिकणांवर कारवाई केली नाही, हल्ल्याचं उत्तर देण्याची हीच रणनीती आहे. मात्र, पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार केला जात असून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे, अशी खंतही ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
सुरुवात त्यांच्याकडून झाली आहे, आमच्याकडून नाही. पहलगाममध्ये पर्यटकांना मारलं नसतं तर आज हा दिवस पाहायची वेळ आली नसते. त्यामुळे, पहिल्यांदा पाकिस्तानला आपली बंदूक शांत करावी लागेल, त्यानंतरच इथल्या बंदुकीची गोळी थांबेल, असेही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.
सत्यपाल मलिक यांचं ट्विट, भारतीय सैन्य दलाचा अभिमान
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर समाधान व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहिली आहे, भारतीय सैन्य दलाचा अभिमान आहे. पक्षीय राजकारणापासून दूर होत भारतातील विविध पक्षाच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशवादी ठिकाणांवर हल्ले केले. त्याबद्दल भारत माता की जय आणि जय हिंद... असे ट्विट सत्यपाल मलिक यांनी केले आहे.