रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवा : मेहबुबा मुफ्ती
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2018 06:17 PM (IST)
रमजानच्या महिन्यात दहशतवादी कारवाया थांबवण्याची मागणी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली.
श्रीनगर : रमजानच्या महिन्यात दहशतवादी कारवाया थांबवण्याची मागणी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली. मात्र त्यांच्या या मागणीचा सुरक्षा यंत्रणांनी तीव्र विरोध केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रायी सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निर्णयाविषयी सल्ला देणार आहेत. दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाया थांबवल्यास ‘ऑपरेशन ऑल आऊट’मुळे दहशतवाद्यांवर आलेला दबाव कमी होईल. शिवाय यामुळे दहशतवादी पुन्हा संघटीत होऊन हल्ले करतील, असं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाकडे जम्मू-काश्मीर सरकारकडून कारवाया थांबवण्यासंदर्भातला कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. असा कोणताही प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार त्याच्या सर्व बाजूंचा विचार करुनच निर्णय घेईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.