नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. आमच्यात फक्त आई किंवा मुलगाच अध्यक्ष होऊ शकतात, असं म्हणत अय्यर यांनी थेट गांधी परिवारावरच निशाणा साधला आहे. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीच्या राहुल गांधींच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.


‘’काँग्रेसचे पुढील अध्यक्ष दोन जण असू शकतात. एक मुलगा, किंवा दुसरी आई. कारण आपण निवडणूक लढायला तयार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. मात्र त्यासाठी विरोधकाची गरज असते. एखादा विरोधक मिळाला तर चांगली गोष्ट आहे. निवडणूक होईल. विरोधकच नसल्यास निवडणूक कशी होईल’’, असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी केला. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ते बोलत होते.

राहुल गांधींची दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी याबाबत संकेत दिले होते.

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात भावना आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं बरंच काम पाहतात. मात्र त्यांना आता जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये सध्या पक्षांतर्गत निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असं सचिन पायलट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

संबंधित बातमी : दिवाळीनंतर काँग्रेस नेतृत्त्वाची धुरा राहुल गांधींकडे : सचिन पायलट