On this day in history March 3 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 3 मार्च रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. प्रत्येक वर्षी तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. 80 च्या दशकातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांचं तीन मार्च 2000 रोजी निधन झालं होतं. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day)


तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. वन्यजीव आणि वनस्पती यांच्याबाबत जागृकता वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. थायलंडमधून याची सुरुवात झाली. प्राणी आणि वन्य जीवनावर असलेला धोका लक्षात घेता 2013 साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वर्ल्डलाईफ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या मनुष्याच्या अनेक कृतीमुळे प्राणी आणि वनस्पती जीवन धोक्यात आल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने CITES या संस्थेची निर्मितीही केली आहे.


2000 : रंजना देशमुख यांचं निधन


80 च्या दशकातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांचं तीन मार्च 2000 रोजी निधन झालं होतं. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले.  मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी 1960 ते 2000पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच 'हरिश्चंद्र तारामती' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी 'असला नवरा नको गं बाई' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर 'मुंबईचा फौजदार', 'सुशीला', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप', 'बहुरूपी', 'बिन कामाचा नवरा', 'खिचडी' अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. 


1943 : दुसऱ्या महायुद्धावेळी लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत 143 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. 


1966  : भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ आजच्याच दिवशी पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. 1901 मध्ये जन्मलेल्या गाडगीळ यांचे शालेय शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी उच्च शिक्षण (एम. लिट.) इंग्लंडमध्ये केंब्रीज विद्यापीठात घेतले. ‘भारतातील औद्योगिक उत्क्रांती (1860 ते 1914)’ हा त्यांचा एम. लिट. साठीच्या प्रबंधाचा विषय होता. 1924 मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेला हा प्रबंध आजही आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानला जातो.



2005 : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. याचं विशेष म्हणजे, त्यांनी पुन्हा इंधन न भरता 67 तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. 


1847  : ग्रॅहम बेल यांचा जन्म 
टेलिफोनचे जनक ग्रॅहम बेल यांचा आजच्याच दिवशी 1847 मध्ये जन्म झाला होता. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला. 1885 मध्ये ते अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सह-संस्थापक सुद्धा होते. दोन ऑगस्ट 1922 मध्ये दूरध्वनी यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंता अलेक्झांडर ग्रॅहम बेल (Alexander Graham Bell) यांचे निधन.


1839 : जमशेदजी टाटा यांचा जन्म – 
आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदची टाटा यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. जमशेदजी टाटा यांनी देशात टाटा समूहातील विविध उद्योग, व्यवसायाची पायाभरणी केली. आज हे  उद्योग देशातील प्रमुख उद्योग म्हणून नावारुपास आले आहे. टाटा समूहाच्या उद्योगांनी जगभरात भारताची एक नवी ओळख करून दिली. 


जमशेदजी टाटा यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे पारशी कुटुंबीय पुजारी म्हणून काम करत होते. मात्र, जमशेदजी यांचे वडील नुसरवानजी टाटा हे व्यवसायात उडी घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. वयाच्या 14 व्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जमशेदजी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षांनी 1868 मध्ये त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला.


'टाटा'च्या संकेतस्थळानुसार, टाटा समूहाने देशातील पहिली मोठी स्टील कंपनी सुरू केली. त्याशिवाय पहिले पंचतारांकीत हॉटेल, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू देणारी कंपनी स्थापन केली. तसेच देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. टाटा एअरलाइन्सचे नाव 'एअर इंडिया' असे करण्यात आले. समूहातील टाटा मोटर्सने रेल्वे इंजिनचे उत्पादन केले होते. 


1860 :  डॉ. हाफकिन यांचा जन्म


प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हाफकिन यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. हापकिन यांच्या संशोधनामुळे प्लेगसारख्या मोठ्या महामारीचा सामना करता आला. जगभरात प्लेगमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता... डॉ. हापकिन यांनी यावर लस शोधली. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला.  मुंबईतल्या हाफकिन संस्थेनं तयार केलेल्या लशींमुळे देशात प्लेग, कॉलरा, रेबीज, पोलिओ अशा आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे.


1967 : शंकर महादेवन 


संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचा जन्म तीन मार्च 1967 रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. मराठी, मल्याळम, तामिळ, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये शंकर महादेवन यांनी गायन आणि संगीत दिलेय. 


अभियांत्रिकीची पदवीप्राप्त शंकर महादेवन यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आपल्या अंगी असलेल्या संगीत कला, कौशल्याला आपला व्यवसाय बनवला.  शंकर महादेवन यांनी 1994 मध्ये आलेल्या "हमसे है मुकाबला या तमिळ चित्रपटाची हिंदी आवृत्ती-कधलन" चित्रपटाद्वारे गायनात पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी "पेट्टा रॅप" आणि "उर्वशी उर्वशी" ही दोन गाणी गायली. 1998 मध्ये आलेल्या "डुप्लिकेट"  चित्रपटातील "तुम नहीं जाना" या गाण्याने त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी “छम्मा छम्मा,” “भुंबरो भुंबरो,” “घनन घनन,” “माही वे,” “कजरा रे,” “मितवा,” “सौ आसून” आणि इतर बरीच हिट गाणी गायली आहेत. शंकर महादेवन यांनी 2004 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “अग्ग बाई अरेच्चा! मधील मन उधाण वा-याचे या गाण्यातून  मराठी संगीतसृष्टीत पदार्पण केले.