मुंबई : सप्टेंबर महिन्यात इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 27 सप्टेंबर या दिवशी इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी, 27 सप्टेंबर 1833 रोजी आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांचं निधन झाल होतं. तसेच भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी भगतसिंह यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं. 


1833- राजा राममोहन रॉय यांचे निधन 


राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy) यांना 'आधुनिक भारताचे जनक' म्हणून ओळखले जाते. भारतीय समाजामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्या अनेक सुधारणांची सुरुवात करण्यामध्ये राजा राममोहन रॉय यांचं मोठं योगदान होतं. राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमधील सती प्रथेला विरोध केला आणि ती अमानवी प्रथा बंद केली. त्यांनी बहुपत्नीत्व प्रथेला विरोध केला. तसेच समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. 


राजा राममोहन रॉय म्हणजेच यांनी हिंदू धर्मातील मूर्तिपूजा आणि अनिष्ट प्रथा यांचा विरोध केला. त्यांनी एकेश्वरवादाचं समर्थन केलं. स्त्री–पुरुष समानतेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. समाजातील सुधारणांना चालना देण्यासाठी त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. ब्राम्हो समाजाची स्थापना करून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक चळवळ सुरू केली. ब्रिटिशांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राजा ही पदवी दिली. राजा राम मोहन रॉय यांचं निधन 27 सप्टेंबर 1833 रोजी झालं. 


1907- भगतसिंह यांचा जन्मदिन 


भारतीय क्रांतिकारकांचा मेरुमणी म्हणून ओळखले जाणारे शहीद-ए-आजम भगतसिंह (Bhagat Singh) यांचा आजच्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 1907 रोजी जन्म झाला. त्यांना देशभक्त कुटुंबाची पार्श्वभूमी होती. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर परिणाम इतका परिणाम झाला की त्यांनी ब्रिटिशांना या देशातून बाहेर काढण्याची शपथ घेतली. 


भगत सिंह यांनी चंद्रशेखर आजाद यांच्या सोबत मिळून 9 सप्टेंबर 1925साली 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)'ची स्थापना केली. या संघटनेचे मुख्य उद्देश हा सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजी सरकार उलथून लावणे हे होतं. 1927 साली भारतात आलेल्या सायमन कमिशनला विरोध करत असतांना इंग्रजांकडून झालेल्या लाठीचारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला म्हणून भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी सॉंडर्सची हत्या घडवून आणली. 


इंग्रजांच्या कैदेत असतांना सुद्धा त्यांनी आंदोलन केलं. नंतरच्या काळात भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्यावर सॉंडर्सच्या हत्येचा आरोप लावण्यात आला. 23 मार्च 1931 रोजी भारत देशाचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारकडून फाशी देण्यात आली.


1996- तालिबानचा काबुलवर कब्जा 


27 सप्टेंबर 1996 रोजी मोहम्मद उमर याच्या नेतृत्वाखाली तालिबानने काबुलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील लोकशाही सरकार उलथवलं आणि अफगाणिस्थानमध्ये सरकार स्थापन केलं. त्यानंतर 26/11 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला संपवण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तालिबानचे सरकार उलथवून लावलं. 


1998- गुगल सर्च इंजिनची स्थापना 


अमेरिकेत पीएचडी करणारे दोन विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्जी बेन यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 1998 रोजी गुगल या सर्च इंजिनची (Google) स्थापना केली. आज गुगल सर्च इंजिनचा उपयोग हा जगभरातील कोणत्याही गोष्टीविषयी माहिती घेण्यासाठी होतो. गुगल सर्च इंजिनचा शोध हा तंत्रज्ञान क्षेत्रातला क्रांतीकारक शोध आहे. 


2020- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना मंजुरी दिली 


मोदी सरकारच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना 27 सप्टेंबर 2020 रोजी त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. मोदी सरकारने कृषी कायद्यात सुधारणा करणारी तीन विधेयकं संसदेत मंजूर केली होती. या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तब्बल एका वर्षाहून जास्त काळ हे आंदोलन करण्यात आलं. शेवटी या आंदोलनाच्या दबावाखाली मोदी सरकारने ती वादग्रस्त विधेयकं मागे घेतली.