नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाच ऑगस्टपर्यंत दोन कोटी 82 लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी आयकर भरला आहे. हे नोटाबंदीचं यश असल्याचा दावा सरकारने केला आहे.


मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 25 टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण 2 कोटी 26 लाख इतके होते. यामध्ये यंदाच्या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा पाच ऑगस्टपर्यंत एकूण 2 कोटी 82 लाख 92 हजार 955 जणांनी आयकर भरला.

काळा पैसा बाळगणाऱ्यांवर आणि कर चुकवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईदेखील केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचा दावा सरकारनं केला आहे.