अहमदाबाद : गुजरातमध्ये परप्रांतियांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन वातावरण तापलं आहे. एका 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. या धास्तीने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं आहे.


गुजरात पोलिसांनी या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 ठिकाणी गुन्हे दाखल केले असून 342 जणांना अटक केली आहे. अहमदाबाद, मेहसाणा, साबरकांठा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय सोशल मीडियावरुन भडकाऊ मेसेज वायरल करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.

पोट भरण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील लोक आता गुजरात सोडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या बस आणि ट्रेन भरुन जात आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबई उत्तर भारतीय चालवतात : संजय निरुपम


हजारोंच्या संख्येने पलायन

मध्य प्रदेशातील भिंड या आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या राजकुमारी जाटवने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं, की ''माझा मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला. पती रंगाचं काम करुन घर चालवतात.'' तर भिंडच्या धर्मेंद्र कुशवाह यांच्या मते, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशच्या कमीत कमी 1500 लोकांनी आतापर्यंत गुजरात सोडलं आहे.

सत्यम ट्रॅव्हलसचे पिंटो सिंह यांच्या माहितीनुसार, ''मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गुजरातमधून दोन दिवसांनी एक बस जाते, ज्यात 25 प्रवासी असतात. पण आता एका बसमध्ये 80 ते 90 जण जात आहेत. शिवाय एका दिवसाला 20 बस भरुन जात आहेत.''

काय आहे गुजरातमधील प्रकरण?

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली.

गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर हल्ले, अल्पेश ठाकोर समर्थित हल्ले असल्याचा आरोप