नवी दिल्ली : टीडीपी खासदार जयदेव गल्ला यांनी आज लोकसभेत मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या चर्चेला सुरुवात केली. जयदेव गल्ला हे दक्षिणेतील खासदार असल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये त्यांचं नाव फारसं परिचित नसावं. पण टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी 52 वर्षीय गल्ला यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी अविश्वास ठरावावर चर्चेला सुरुवात केली.


अविश्वास ठराव केसिनेनी श्रीनिवास यांनी मांडला असला तरी नायडूंनी चर्चेच्या सुरुवातीसाठी जयदेव गाला यांच्यावर भरवसा दाखवला. यावरुन पक्षात मोठ्या जबाबदारीसाठी त्यांना तयार केलं जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोण आहेत जयदेव गाला?

आंध्र प्रदेशचे उद्योजक आणि राजकीय नेत्यांमधील एक नाव म्हणजे जयदेव गल्ला. परदेशात शिकलेल्या उद्योजक जयदेव गल्ला यांनी वयाच्या चाळिशीत राजकारणात प्रवेश केला. जयदेव हे अमर राजा ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रमुख आहेत. त्यांच्या अनिवासी वडिलांनी याची सुरुवात केली होती. जयदेव गल्ला तीन दशकांपूर्वी अमेरिकेतून भारतात परतले होते. या ग्रुपच्या मोठ्या उत्पादनांमध्ये अॅमरॉन बॅटरीचा समावेश आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयदेव गल्ला यांनी 683 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी गुंटूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता.

महेश बाबू जयदेव गालांचा मेहुणा

जयदेव गल्ला हे चित्तूरमधील आहेत. तेलुगु चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांची मुलगी पद्मावतीसोबत त्यांचं लग्न झालं. सुपरस्टार महेश बाबू हा जयदेव गल्ला यांचा मेहुणा आहे.

चंद्राबाबू आणि जयदेव याचं चित्तूर कनेक्शन



चंद्राबाबू नायडूही चित्तूरमधीलच आहे. जयदेव यांचा जन्म झाला, तिथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर नायडू यांचं घर आहे. दोन्ही कुटुंबामधील संबंध अतिशय चांगले आहेत. जयदेव गल्ला यांचे आजोबा पी राजगोपाल नायडू हे चंद्राबाबूंचे मेंटॉर होते. परदेशात शिक्षण पूर्ण केलेल्या आंध्र प्रदेशातील सुरुवातीच्या लोकांमध्ये पी राजगोपाल नायडू यांचा समावेश आहे. पी राजगोपाल नायडूंनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, मग ते राजकारणात आले. त्यांची मुलगी अरुणा अमेरिकेत शिकली आहे. ती भारतात आली आणि जयदेव यांच्या वडिलांशी लग्न केलं. त्या देखील राजकारणात आल्या आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार आणि मंत्रीही बनल्या. नुकताच त्यांनी तेलगु देसम पक्षात प्रवेश केला. जयदेव गल्ला यांनी आपल्या आईकडून राजकारणाचे धडे गिरवले आहेत.

अमरॉन बॅटरीची निर्मिती

जयदेव यांचे वडील रामचंद्र यांचं शिक्षणही अमेरिकेत झालं आहे. दोन दशक तिथेच काम केल्यानंतर ते चित्तूरला परतले. त्यांनी अमर राज ग्रुप ऑफ कंपनीजची सुरुवात केली. आता कंपनीचा टर्नओव्हर सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. आपल्या वडिलांकडून बिझनेसमधील बारकावे शिकणाऱ्या जयदेव यांनी अॅमरॉन बॅटरीची सुरुवात केली, जो सध्या भारतात दुसरा सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. पूर्व आशियामध्येही ही बॅटरी अतिशय लोकप्रिय आहे.