नवी दिल्ली : आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला असून आपण भारतात पाऊल ठेवताच भारतातील कोरोना संपणार असा दावा स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने केला आहे. असा दावा करताना त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता जरा कुठे कमी होत आहे. रोजच्या चार लाख रुग्णसंख्येची भर पडणाऱ्या देशातील नव्या रुग्णांची आकडेवारी गेली दोन दिवस झाले एक लाखांच्या आत आली आहे. त्याचवेळी या नित्यानंदचा दावा असलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे असं समजतं. त्यामध्ये नित्यानंदचा एक शिष्य त्याला विचारतो की भारतातून कोरोनाची महामारी कधी संपेल. त्यावर उत्तर देताना नित्यानंद म्हणतो की, आता आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील कोरोना संपेल. 


भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 19 एप्रिल रोजी कथित स्वामी नित्यानंदने स्वत:च्या मालकीचा देश जाहीर केलेल्या 'कैलासा'वर भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारत, ब्राझिल, मलेशिया आणि युरोपियन युनियनमधील प्रवाशांनी कैलासावर येऊ नये असं त्याने सांगितलं होतं.


भारतातून फरार
भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेला नित्यानंद हा 2019 साली देशातून फरार होऊन इक्वेडोरच्या एका बेटावर जाऊन लपला आहे. त्या बेटावर त्याने आपलं बस्तान मांडलं असून कैलासा या नव्या देशाला मान्यता मिळावी म्हणून संयुक्त राष्ट्राकडे अनेक वेळा मागणी केली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये नित्यानंदने आपल्या स्वत:च्या मालकीच्या रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा ची स्थापना केली आणि कैलाशियन डॉलर चलनाचीही घोषणा केली. 


नित्यानंद हा 'कैलासा' ला एक स्वतंत्र्य देश मानतो आणि आपण त्याचे सर्वेसर्वा असल्याचा दावा करतो. या देशाच्या माध्यमातून आपण हिंदू धर्माचा प्रसार करत असल्याचा दावाही तो करतो. 


महत्वाच्या बातम्या :