पाटना : जवळपास 16 महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘संघ मुक्त भारत’चा नारा दिला होता. कारण, नितीश कुमार यांच्या पक्षाने लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन, सत्ता स्थापन केली होती. पण आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर जो संघ आणि भाजप जातीयवादी वाटत होता. आज तोच पक्ष आणि संघटना नितीश कुमारांना जवळची वाटू लागली आहे.

नितीश कुमार यांच्ये आता मन परिवर्तन झाले असून, येत्या बुधवारी ते सरसंघचालक मोहन भागवतांना भेटणार आहेत. येत्या बुधवारी भोजपूरमध्ये रामानुजाचार्यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे बुधवारी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसतील.

यावर जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी सांगितलं की, हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. याकडे राजकारणापलीकडच्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. या कार्यक्रमासाठी इतरही अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांची नावं घोटाळ्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी महागठबंधनशी संबंध तोडले होते. यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन पुन्हा सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान, ‘संघ मुक्त भारत’चा नारा दिल्यानंतर नितीश कुमार आणि मोहन भागवतांची ही तशी पहिलीच भेट असणार आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.