Continues below advertisement


पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी खातेवाटप जाहीर केलं आहे. नितीश कुमार यांच्यासोबत 24 जणांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार यांनी गृहमंत्रिपद त्यांच्याकडे ठेवलं होतं. यावेळी नितीश कुमार यांनी गृहमंत्रिपद भाजपच्या सम्राट चौधरींना दिला आहे. नितीश कुमार यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये सत्तेत असताना गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं होतं. यावेळी बिहार सरकारमधील महत्त्वाची खाती मात्र भाजपच्या नेत्यांना देण्यात आली आहेत.


महत्त्वाची खाती भाजपकडे


नितीशकुमार यांनी बिहारमधील खातेवाटप जाहीर केलं आहे. गृह मंत्रालय भाजपच्या सम्राट चौधरींकडे देण्यात आलं आहे. तर, महसूल खात्यावरही भाजपचे वर्चस्व पाहायला मिळतंय. विजय कुमार सिन्हा यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं आहे. आरोग्य , कायदा , कृषी , उद्योग , सहकार , मागासवर्गीय कल्याण , अनुसूचित जाती जमाती , नगरविकास भाजपकडे देण्यात आली आहेत.


लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाकडे ऊस उद्योगाहस सार्वजनिक आरोग्य नियंत्रण विभाग तर जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीकडे सूक्ष्म जल संधारण खातं देण्यात आलं आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला पंचायत राज विभाग सोपवण्यात आला आहे.


नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात 24 जणांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. आतापर्यंत 18 जणांची खाती जाहीर करण्यात आली आहेत. तर, 6 मंत्र्यांची खाती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.


कोणाला कोणतं खातं मिळालं?


उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे महसूल आणि खनिकर्म मंत्रालय देण्यात आलं आहे. भाजपच्या मंगल पांडे यांना आरोग्य आणि विधी व न्याय खातं दिलं गेलं आहे. दिलीप जयस्वाल यांना उद्योग खातं देण्यात आलं आहे. नितीन नवीन यांना नगर विकास आणि रस्ते विकास खातं देण्यात आलं आहे. रामकृपाल यादव यांना कृषी खातं देण्यात आलं आहे. संजय टायगर यांना श्रम संसाधन खातं देण्यात आलं आहे. अरुण शंकर यांना पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य, युवक विभाग, सुरेंद्र मेहता यांना पशुसंवर्धन आणि मत्स्य, नारायण प्रसाद यांना आपत्ती व्यवस्थापन, रमा निषाद यांना ओबीसी आणि ईबीसी कल्याण, लखेद पासवान यांना अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती कल्याण, श्रेयसी सिंह यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्रीडा, प्रमोद चंद्रवंशी यांना सहकार, पर्यावरण, वन वातावरणीय बदल खातं दिलं गेलं आहे.