दहशतवादाचे समर्थन कराल तर तुमचे पाणी बंद करु, गडकरींचा पाकिस्तानाला इशारा
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2019 03:04 PM (IST)
दहशतवादावरुन केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : दहशतवादावरुन केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. गडकरी म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर भारत सिंधू जल करार मोडून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल. गडकरी म्हणाले की, सिंधू जल करारामध्ये अनेक अटी आहेत. दोन्ही देशांमध्ये बंधुत्व वाढावे, शांता प्रस्थापित व्हावी आणि सहकार्य वाढवणे हे या करारामागचे उद्दिष्ट होते. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. गडकरी म्हणाले की, दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान आम्हाला सहकार्य करत नाहीच त्याऐवजी आम्हाला बॉम्ब मिळत आहेत. आमच्या देशावर दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे आम्ही सिंधू कराराचे पालन करण्याचे कोणतेही कारण उरत नाही. हा करार मोडून आम्ही सिंधू नदीचे पाणी आमच्या राज्यांमध्ये स्थानांतरित करु. काय आहे सिंधू नदी करार? सिंधू नदी पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते. सिंधू नदी करारांतर्गत सतलज, व्यास, रावी, सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांच्या पाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सतलज, व्यास आणि रावी नद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारतासाठी ठेवण्यात आलं आहे. तर सिंधू, झेलम आणि चेलाम या नद्यांच्या पाण्याचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. सिंधू जल कराराविषयी संपूर्ण माहिती वाचा : पाकचं पॅनिक बटण, भारताच्या हातात ... तर पाकिस्तानचं वाळवंट होईल भारताने हा करार रद्द केल्यास हे पाकिस्तानच्या नापाक हरकतींचं भारताने दिलेलं उत्तर असेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांवर पाकिस्तानचे अनेक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. ज्यातून पाकिस्तानला वीज मिळते. शिवाय या तिन्ही नद्यांवर पाकिस्तानातील सिंचन प्रकल्पही आधारीत आहेत. त्यामुळे भारताने हा करार तोडल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव येणार आहे. भारताने या करारांतर्गत 1960 पासून पाकिस्तानची तहान भागवली आहे. मात्र पाकिस्तानने स्वतंत्र झाल्यापासून भारताविषयी तिरस्काराचीच भूमिका ठेवली आहे. त्यामुळे भारत या निर्णयाद्वारे पाकिस्तानला कठोर उत्तर देऊ शकणार आहे.