नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु झाली आहे. काल यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची पहिली बैठक पार पडली. देशात 350 जागा जिंकतानाच महाराष्ट्रातलं भाजपचं टार्गेट 48 पैकी 28 असल्याची माहिती 'एबीपी माझा'ला बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या आक्रमक टार्गेटचे पडसाद साहजिकच महाराष्ट्राच्या राजकारणावर, मित्रपक्ष आणि विरोधकांवर होताना दिसणार आहेत. याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट.


भाजपला देशात 350 तर महाराष्ट्रात 28 जागा स्वबळावर जिंकायच्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून 18 महिने बाकी आहेत. पण आत्ताच या लढाईसाठी भाजपनं आपलं लक्ष्य निर्धारित केलं आहे. दिल्लीतल्या 11, अशोका रोडच्या भाजप मुख्यालयात काल पक्षाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातल्या जागांबाबतही विभागनिहाय चर्चा या बैठकीत झाली. राज्यात 48 पैकी 28 जागा भाजपला एकट्याच्या ताकदीवर जिंकायच्या आहेत.

महाराष्ट्रात 2014 साली नेमकं काय चित्र होतं?

भाजपनं 24 जागा लढवून 23 जिंकल्या
शिवसेनेनं 20 जागा लढवून 18 जिंकल्या

आधी शिवसेना भाजपमध्ये 26-22 असा जागावाटपाचा फॉर्म्युला होता. पण 2014 मध्ये मित्रपक्षही सोबत होते.
त्यामुळे आरपीआयसाठी 1, रासपसाठी 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी 2 अशा 4 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या फार्म्युलानुसार भाजपनं 24, शिवसेनेनं 20, तर मित्रपक्षांनी 4 जागा लढलेल्या होत्या.

भाजपचं 28 जागा जिंकण्याचं स्वप्न बारकाईनं पाहिलं तर याचा पहिला तोटा त्यांच्याच मित्रपक्षांना होणार हे उघड आहे. शिवाय यात शिवसेनेला नेमकं स्थान काय असणार असा प्रश्न उपस्थित होतो. 28 जागा भाजपला जिंकायच्या असतील तर तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त जागा भाजपला आधी लढव्याव्या लागतील. त्यामुळे मागच्यावेळी मित्रपक्षांना दाखवलेली उदारता यावेळी भाजप दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होतो.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असतानाच या रणनीतीवर विचार सुरु होता. तसंही शिवसेनेचे 18 खासदार मोदींच्याच नावावर निवडून आले, असा भाजपचा दावा सुरु असतोच. त्यामुळे मोदीकार्डचा फायदा त्यांना करुन देण्यापेक्षा, तो आपल्या खात्यात कसा जास्त वळवता येईल याकडे भाजपचं लक्ष आहे. त्यामुळे लोकसभेला जागावाटपात जोरदार रस्सीखेच होणार हे नक्की आहे. शिवाय कुणी माघार घेतली नाही तर विधानसभेप्रमाणे पुन्हा स्वतंत्र लढण्याचाही पर्याय मोकळा आहेच.

गेल्या दोन महिन्यांपासून अमित शाह देशातल्या प्रत्येक राज्यात तीन दिवसांचा दौरा करत आहेत. त्यांच्या या दौऱ्यातून जमा झालेल्या माहितीच्या आधारे हा 350 जागांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 5 जागांचे छोटे गट करुन त्याची जबाबदारी एकेका केंद्रीय मंत्र्यावर सोपवली जाणार आहे. प्रत्येक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जागांबाबतही या बैठकीत तपशीलवार प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं. विदर्भ-खानदेशाच्या पलिकडे इतरत्रही आपली ताकद अजून कशी वाढवता येईल यावर विचार झाल्याचं कळतंय.

मिशन 350 यशस्वी करण्यासाठी भाजपनं एकमेव जालीम निकष ठरवला आहे, तो म्हणजे निवडून येण्याची पात्रता. एकदा का याच्याबद्दल समाधान झालं की तो व्यक्ती कुठल्या पक्षातला आहे, त्याची पार्श्वभूमी काय, याच्यापेक्षाही त्याला आपल्या पक्षात आणलं की पवित्र समजून कमळाचा शिक्का लावायचा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात इतर विरोधी पक्षातल्या काही बालेकिल्ल्यांना सुरुंग लागून ते ढासळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.