Chief Justice of India: देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी आज शपथ घेतली. सरन्यायाधाीश उदल लळीत यांचा कार्यकाळ हा 75 दिवसांचाच असणार आहे. सरन्यायाधीश म्हणून अतिशय कमी कालावधी मिळालेले न्या. लळीत हे पहिलेच सरन्यायाधीश नाहीत. काही सरन्यायाधीशांना 30 दिवसांचा कालावधी मिळाला होता. एका सरन्यायाधीशांना फक्त 18 दिवसांचाच कालावधी मिळाला होता. 


सरन्यायाधीश उदय लळीत हे सरन्यायाधीश होण्यापूर्वी कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नव्हते. वकीली करून ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश झाले. त्याआधी 1971 मध्ये न्या. एस.एम. सीकरी यांची सरन्यायाधीशपदी निवड झाली होती. 


या सरन्यायाधीशांचा कमी कालावधी


विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांना 75 दिवसांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, एका सरन्यायाधीशांचा कालावधी हा फक्त 18 दिवसांचा होता. न्या. कमल नारायण सिंह यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ फक्त 18 दिवसांचा होता. न्या. सिंह हे 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 1991 पर्यंत सरन्यायाधीश होते. सर्वात कमी कालावधी मिळालेले हे सरन्यायाधीश आहेत. 


न्या. एस. राजेंद्र बाबू यांना सरन्यायाधीश म्हणून फक्त 30 दिवसांचा कालावधी मिळाला. न्या. राजेंद्र बाबू यांनी 2 ते 31 मे 2004 दरम्यान सरन्यायाधीश होते. 


न्या. जे. सी. शाह हे 17 डिसेंबर 1970 ते 21 जानेवारी 1971 या कालावधीत 36 दिवसांसाठी सरन्यायाधीश होते. 


न्या. गोपाल बल्लभ पटनायक यांनी 8 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2002 दरम्यान या 40 दिवसांसाठी सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले. 


दरम्यान, न्या. उदय लळीत हे वकिली करत असताना क्राइम लॉमध्ये विशेष प्राविण्यासाठी ओळखले जायचे. अनेक गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यात त्यांनी आपल्या अशिलांची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. कायद्याची जाण, मृदू स्वभाव, बिनतोड युक्तिवादासाठी ते ओळखले जात असे. न्या. लळीत यांनी 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीत सुरूवात केली होती. 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. त्यानंतर 1986 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले. 


मराठमोळे सरन्यायाधीश


सरन्याधीशपदाची जबाबदारी स्वीकारणे उदय लळीत हे चौथे मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. याआधी पी.बी. गजेंद्रगडकर, यशवंत चंद्रचूड आणि शरद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च स्थान भूषवले होते. न्या. लळीत यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक 'एलसीपीएस' डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.