नवी दिल्ली : एनडीटीव्हीवर लादलेल्या एक दिवसीय बंदीच्या विरोधात चॅनलने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 9 नोव्हेंबरला चॅनल बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेत. त्याविरोधात एनडीटव्हीने सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे.


जानेवारी महिन्यात झालेल्या पठाणकोट हल्ल्याचं अतिप्रमाणात कव्हरेज केल्याचा ठपका चॅनलवर ठेवण्यात आला आहे. अतिसंवेदनशील माहिती दाखवल्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहचत असल्याचा दावा केंद्रानं केला.

माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एनडीटीव्ही इंडियाला 9 नोव्हेंबरला दुपारी एकपासून ते 10 नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत आपलं प्रसारण बंद ठेवावं लागणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मते, ‘अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. तसेच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते.’ असं या समितीचं म्हणणं आहे.

एखाद्या न्यूज चॅनलवर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या निर्णयावर टीका केली जात आहे.

संबंधित बातम्या :

'एनडीटीव्ही'नंतर आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई


पठाणकोट हल्ला: एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी


बंदीबाबत एनडीटीव्हीचं स्पष्टीकरण जसंच्या तसं