NCERT Textbook:  राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने  (National Council of Educational Research and Training -NCERT) पुन्हा एकदा आपल्या पुस्तकांमध्ये बदल केला आहे. इयत्ता दहावीच्या समाजशास्त्र आणि विज्ञानाच्या पुस्तकातून काही धडे, भाग वगळण्यात आले आहेत. एनसीईआरटीने घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.  


इयत्ता 10वीच्या विज्ञानाच्या रसायनशास्त्रातील पुस्तकातून आवर्तन सारणी वगळण्यात आली आहे. रसायनशास्त्राचे आकलन विकसित करण्यासाठी आवर्त सारणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. याच्या मदतीने रासायनिक घटकांचा क्रम आणि त्यांची वैशिष्ट्ये अशा अनेक गोष्टी समजतात. एनसीईआरटीच्या या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि तज्ज्ञ खूप नाराज आहेत. देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.


त्याशिवाय, इयत्ता दहावीच्या समाज शास्त्राच्या डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स विषयाच्या पुस्तकातून लोकशाही, विविधता आणि राजकीय पक्षांशी संबंधित धडा वगळण्यात आला आहे. लोकशाही आणि विविधता, राजकीय पक्ष आणि लोकशाहीसमोरील आव्हाने अशी या धड्यांची नावे आहेत. 


एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून विविध प्रकरणे काढून टाकण्यावरून वाद सुरू झाला आहे. अनेक तज्ज्ञांनी या निर्णयाला विरोध केला आहे. खरं तर, कोविड महासाथीच्या काळात, एनसीईआरटीने विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा भार कमी करण्यासाठी विविध प्रकरणे काढून टाकले होते. आता ही प्रकरणे कायमची वगळण्यात आली आहेत. शास्त्रज्ञ आणि शिक्षकांनी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातून महत्त्वाची प्रकरणे वगळल्यामुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


या आधी एनसीईआरटीच्या पुस्तकातून अनेक प्रकरणांवर 'लाल शेरा'


एनसीईआरटीने आपल्या अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत सांगणारे प्रकरणही वगळले होते. त्याआधी इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून महात्मा गांधी यांनी धार्मिक सलोख्यासाठी केलेले प्रयत्न,  महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेली बंदी आदी भाग वगळण्यात आला. त्याशिवाय, पुस्तकातून एका धड्यातील गुजरात दंगलीवरील एक भाग वगळण्यात आला. यामध्ये निवासी भागात धर्म, जाती आणि वर्णाच्या आधारे वस्ती वसवली जात असते आणि 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर धर्म, जातीच्या आधारे लोकांमध्ये दुरावा वाढत चालला असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. नव्या पुस्तकात या उताऱ्यासह इयत्ता सहावी ते 12 वी पर्यंतच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातून गुजरात दंगलीशी संबंधित माहिती हटवण्यात आली आहे. 


दिल्ली सल्तनतच्या (मामलुक, तुघलक, खिलजी, लोधी आणि मुघल) शासकांशी संबंधित अनेक विभाग इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यात आले आहेत. तसेच हुमायून, शाहजहान, बाबर, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारा तक्ताही काढण्यात आला. 12वी NCERT मध्ये आणीबाणी आणि त्याचे परिणाम यावरील प्रकरण फक्त पाच पानांपर्यंत कमी करण्यात आला आहे. इयत्ता 6वीच्या पुस्तकात 'वर्णा'चा भाग अर्धा करण्यात आला आहे आणि सहावी ते 12वीच्या पुस्तकातून सामाजिक चळवळीशी संबंधित तीन प्रकरणं काढून टाकण्यात आले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI