नागपूर : नक्षलवाद्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. 29 मार्चला भारत बंद करण्याचे आवाहन केले असून, हा बंद प्रोफेसर साईबाबा, हेम मिश्रा आणि इतर यांना मिळालेल्या आजन्म कारावासाच्या विरोधात पुकारला आहे.


महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील नक्षली भागातून पोलिसांना भारत बंदची हाक संदर्भातील पत्र मिळाली आहेत. कम्युनिस्ट पार्टीने (माओवादी) पत्रकं काढली असून, यातून भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी एन साईबाबा, जेएनयूचे विद्यार्थी राहिलेले हेम मिश्रा आणि व्यावसायिक क्रांतिकारी म्हणून माओवाद्यांचे काम पाहणाऱ्या प्रशांत राही या तिघांना इतर दोघांसह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, हे गुन्हेगार नसून त्रस्त जनतेचे नेते आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात असाही आरोप करण्यात आला आहे की, "देशात पाशवी अत्याचार सुरु आहेत आणि त्याच्या विरोधात ही मंडळी काम करतात. त्यामुळे त्यांना मिळालेल्या या शिक्षेच्या विरोधात आवाज उचला."

देशातील ज्या ज्या राज्यात नक्षलवाद आहे, त्या त्या ठिकाणची पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. कडक बंदोबस्त देऊन कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी जिथे त्यांचे वर्चस्व आहे, तिथे त्यांनी पुकारलेला बंद हा बंदुकीच्या जोरावर सुद्धा लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.