नवी दिल्ली : भाजपचा शीख चेहरा म्हणून काही दिवसांपूर्वी ओळखल्या जाणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रवेशासोबतच सिद्धू यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपसोबतच अकाली दल आणि आम आदमी पक्षावरही सिद्धूंनी टीकास्त्र सोडलं आहे.


पंजाबमध्ये 55 टक्के युवावर्ग आहे. एकेकाळी देशाची ढाल असणारा पंजाब ड्रग्जमुळे बदनाम झाल्याचं सिद्धू यांनी म्हटलं. ड्रग्जमुळे पिढी बरबाद झाल्याचा घणाघात सिद्धूंनी केला. यासाठी सत्ताधारी अकाली दलाला त्यांनी जबाबदार धरलं आहे.

'भाग बाबा बादल भाग, पंजाब की जनता आती है' असं म्हणत सिद्धूंनी बादल परिवारावर जोरदार हल्ला चढवला. अन्नदात्या शेतकऱ्याला भिकारी केल्याचंही ते म्हणाले.

'माता तो कैकयी भी थी, लेकिन वनवास भेजती थी, कौशल्या बुलाती थी. सारा पंजाब जानता है मंथरा कौन थी, कौन सिद्धू से जलता था, जनता सब जानती है' असं म्हणत सिद्धूंनी अप्रत्यक्ष टोला हाणला.

मी जन्मतःच काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणं ही माझी घरवापसी आहे. माझ्या मुळांशी पुन्हा नाळ जुळली, अशी स्तुतिसमुनं सिद्धूंनी उधळली. हा माझा वैयक्तिक लढा नसून काँग्रेसच्या अस्तित्व आणि स्वाभिमानाची लढाई आहे, असं सिद्धू म्हणाले. रविवारी राहुल गांधींच्या निवासस्थानी सिद्धूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात लढाल का, या प्रश्नाला जर लालू आणि नितीशकुमार एकत्र येऊ शकतात, तर मी आणि अमरिंदर सिंह का येऊ शकत नाही, असा प्रतिप्रश्न सिद्धू यांनी केला. 'बीज बो दो, फूल खिलकर चमन को बहार देंगें, दिशा दे दो ये युवा मिलकर पंजाब को संवार देगें' अशी शेरोशायरीही त्यांनी जाता-जाता केली.