नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सध्याच्या सर्वात वादग्रस्त विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एनआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंगसारख्या विविध विषयांवर आपलं मत मांडलं. एनआरसीच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही.


आरक्षणाच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, जातीनिहाय आरक्षण बदलण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही. तसेच भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली महाआघाडी फार काळ टिकणार नाही. याशिवाय आमच्या सरकारने गेल्यावर्षी आमच्या देशातील एक कोटी युवकांना रोजगार दिल्याचा दावाही यावेळी मोदींनी केला. नरेंद्र मोदींची मुलाखत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.


जातीनिहाय आरक्षणाला धक्का लावणार नाही
देशात आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी लोग रस्त्यावर उतरले आहे. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले की, आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने देशाची ताकद आहे आणि आम्ही ती पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. सबका साथ, सबका विकास हा आमचा उद्देश आहे. गरीब, पीडित, दलित, मागास, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांचं हित जपणं गरजेचं आहे.


एनआरसीवर काय बोलले मोदी?
कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. ज्या नागरिकांची नावं यादीत नाहीत, त्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एनआरसीच्या मुद्यावर मोदींवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी यांना उत्तर देत म्हटलं की, ज्या लोकांचा स्वत:वरचा विश्वास उडला आहे, ज्यांना देशातील नागरिकांच समर्थन नाही, जे देशातील महत्त्वाच्या संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक देशाचे तुकडे करण्याच्या गोष्टी करतात.


एक कोटी तरुणांना रोजगार दिले
देशात बेरोजगारी मोठी समस्या आहे. विरोधी पक्ष याच विषयावर मोदी सरकारवर वारंवार टीका करत आहे. या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाले नाही हे बोलणं आता बंद करायला हवं. याशिवाय विविध केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत या योजनांद्वारे रोजगार उपलब्ध झाले नाही का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.


मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी
जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या मुद्द्यावरही मोदींनी मौन सोडलं आहे. अशा घटना दु्र्दैवी आहेत. सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता आणि एकता निर्माण करायला हवी. अशा घटनानांवर आणि अशा मानसिकतेवर आम्ही अनेकदा स्पष्ट शब्दात आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अशा घटनांचं समर्थन होऊ शकत नाही.


महाआघाडी फार काळ टिकणार नाही
भाजपला पराभूत करण्यासाठी एक आलेल्या विरोधकांनी महाआघाडीची स्थापना केली आहे. यावरुन मोदींनी हल्लाबोल केला. ही महाआघाडी फार काळ टिकणार नाही. फक्त ही महाआघाडी निवडणुकी आधी तुटते की निवडणुकीनंतर हे पाहावं लागणार आहे. महाआघाडी वैचारिक समर्थन, जनतेच्या अपेक्षा, विकास, वैचारिक एकतेसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी या महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपच्या लोकप्रियतेबाबत विरोधीपक्ष चिंतीत आहे. त्यामुळे एकट्याने लढण्याची हिंमत विरोधकांमध्ये राहिली नाही.