मुंबई: अयोध्येच्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मुंबई ते अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा इंडिगोने (Indigo) केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक सुखकर होणार आहे. या आधी दिल्ली ते अयोध्या अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतूनही 6 जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 


अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असून देशभरातून भक्त अयोध्येत येणार आहेत. अयोध्येत विमानतळ झाल्यानंतर विमान वाहतूक कंपन्या अयोध्येसाठी फ्लाईट सुरु करत आहेत. 


30 डिसेंबरपासून दिल्ली ते अयोध्या विमानसेवा


सर्वात प्रथम 'इंडिगो'ने दिल्ली ते अयोध्या ही फ्लाईट सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुंबईतून अयोध्येला जाण्यासाठी मार्ग सुखकर होणार आहे. विमान वाहतूक कंपनी 'इंडिगो' 30 डिसेंबर पासून दिल्लीतून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मिती होत असतानाच अनेक राम भक्त दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. 


मुंबई ते अयोध्या विमानसेवा सुरु होणार 


'अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळा'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'इंडिगो'ने (Indigo)  दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्येतून दिल्ली आणि अहमदाबादसाठी फ्लाईट सुरु होणार आहेत. इंडिगो ही कंपनी अयोध्येतून व्यावसायिक दृष्ट्या 6 जानेवारीपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करणार आहे. राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात 


22 जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील. त्यामुळे इंडिगोने मुंबईतून फ्लाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?


राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.


अयोध्येत रामलालच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या