नवी दिल्ली : राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नरेश अग्रवाल यांच्यावर आता मुलायम सिंह निशाणा साधला आहे. 'नरेश अग्रवाल पक्ष सोडून गेल्याने कोणतंही नुकसान होणार नाही, झाला तर पक्षाला फायदाच होईल.' असं मुलायम सिंह यावेळी म्हणाले.


नरेश अग्रवाल यांनी काल (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी बोलताना त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ''मुलायम सिंग यादव आणि रामगोपाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत आहे. सिनेमात डान्स करणारीसाठी माझं तिकीट कापण्यात आलं. माझा मुलगा आमदार आहे आणि तो राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार,'' असं वक्तव्य नरेश अग्रवाल यांनी केलं होतं.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर अग्रवाल यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. 'जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो.' असं अग्रवाल यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

सिनेमात नाचणारीसाठी माझं तिकीट कापलं : नरेश अग्रवाल