नवी दिल्ली : ‘कोरेगाव-भीमा जे घडलं तसंच असंच जर सुरु राहिलं तर, महाराष्ट्रच नाही तर आपल्या देशाचे तुकडे होतील आणि ते होण्याआधी मला मरण आलेलं बरं... हे मला कदापी सहन होणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी थेट आणि परखड मतं मांडली आहेत.


उदयनराजे भोसलेंची मुलाखत जशीच्या तशी :

प्रश्न : कोरेगाव-भीमामध्ये जे घडलं त्यानंतर मराठा-दलित असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. हे सर्व पाहिल्यानंतर तुमची याबाबतची प्रतिक्रिया काय होती?

उदयनराजे भोसले : मला एवढंच वाटतं, मनापासून दु:ख वाटलं... ज्यावेळेस  स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजांना बरोबर घेतलं. त्यामुळे आता मला या सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. की, कोण मराठा, कोण दलित, कोण गुजराती... मी तर जातपात मानतही नाही. ईश्वराला मी प्रार्थना करतो की, अजिबात कोणाचा घातपात होऊ नये. पण ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस रक्ताची गरज लागते. तेव्हा तुम्ही का विचार करत नाही की, हे रक्त दलिताचं आहे, मराठ्याचं, ब्राम्हणाचं आहे की गुजरात्याचं? मग हे जे तेढ निर्माण करणारे लोकं आहेत त्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. मग ते कोणीही असू दे... वैयक्तिक स्वार्थासाठी कोण काय बोलतं याच्याशी मला घेणंदेणं नाही. पण असे प्रकार चुकीचे आहेत.

जर असंच सुरु राहिलं तर तुम्हाला सांगतो,  महाराष्ट्रच नाही तर आपल्या देशाचे तुकडे होण्याआधी मला मरण आलेलं बरं... हे मला सहन होणार नाही.

प्रश्न : भिडे गुरुजींना तुम्ही ओळखता, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

उदयनराजे भोसले : भिडे गुरुजी वडिलधारी आहेत. त्यांच्याबद्दल आदर तर आहेच आणि राहणारच. त्यांनी संघटन लहान-लहान मुलांचं केलं. त्यांचं काय संबंधपण नाही. किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. पण आज जे बोलतात त्यांच्याविरोधात त्यांची लायकीपण नाही. आज पीएचडी केलेला हा एक नंबर माणूस आहे. अहो कधी-कधी मी विचार करतो. हे जर आम्हाला प्रोफेसर असते आणि जर प्रश्नउत्तरं दिली असती तर मी कधी आयुष्यात पास झालो नसतो. एवढा ग्रेट माणूस. त्यांच्यावर अॅट्रॉसिट केस घालता. बरं केस घातल्या तर घातल्या. पण थोडा तरी विचार करायला पाहिजे ना.

प्रश्न : राष्ट्रवादीचेच नेते विशेषत: जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते यांचं म्हणणं आहे की, भिडे गुरुजी हे ज्या पद्धतीनं प्रचार करतात किंवा वक्तव्य करतात त्यामुळे सगळा प्रकार भडकला.

उदयनराजे भोसले :  नाही... जितेंद्र माझा मित्र आहे, आमदार आहे, हॅण्डसम आहे. पण थोडं त्यांने पण विचार केला पाहिजे. आपण काय बोलतो, कुणाशी बोलतो आणि कशासाठी बोलतो?... इफ अँड बट, ऑलवेज देअर  कोण बघायला होतं का, काय झालं, काय घडलं, कशामुळे घडलं.. कधी कुणी विचार केला? नाही.

प्रश्न : तुम्हाला असं वाटतं की, छत्रपतींना अशा संकुचित दृष्टीनं नाही पाहिलं पाहिजे, ते सर्व समाजाचे आहेत. मराठा समाजानं देखील सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी.

उदयनराजे भोसले :  अहो...  हे प्रकरण घडलं तेव्हा मला हसू का रडू असं झालं. आता एक ते दीड वर्ष निवडणुकीला बाकी आहेत. निवडणूक सोडून द्या हो... ज्या लोकांनी त्याग केला, मी त्या घराण्यातील आहे म्हणून बोलत नाही. पण ते लोकं ग्रेट होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज... तुम्ही त्यांचाही मान ठेवणार नसाल तर मग लायकी काय आपली?

प्रश्न : कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर तुमचं संभाजी भिडे यांच्याशी काही बोलणं झालं, चर्चा झाली?

उदयनराजे भोसले : रडले, ते म्हणाले माझा काही संबंध नाही. म्हणलं गुरुजी तुम्ही रडू नका. ते बोलले महाराज, उभ्या आयुष्यात राहिले किती वर्ष, माझं कधीही काही होऊ शकतं. मी फक्त लोकांना प्रोत्साहन दिलं, हे केलं, ते केलं. मिलिंद एकबोटे सुद्धा माझा मित्र आहे. त्यांना मी मनापासून सांगतो कारण नसताना उद्रेक जिथे होईल, असं वक्तव्य करु नका."

प्रश्न : एकूण ज्या पद्धतीचा प्रयत्न झाला मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचा, तुमचं काय आवाहन आहे मराठा समाजासाठी आणि एकूणच सर्वासांठी?

उदयनराजे भोसले : तुम्ही बघा ना... कॉमनसेन्स का कॉमन म्हणतात? आय डोंट नो... पण आज अगदी जातीपातीवर उतरायचं म्हटलं तर... मी तर मानतही नाही. पण किती टक्के आहेत महाराष्ट्रात मराठा... मग ते लोकं जर उतरले तर काय होईल? मग कशाला, कशाकरता? अहो रक्त एकच आहे. अहो शिवाजी महाराजांचे मावळे जे होते ते इतर जातीचेही होते. अहो कुठली जातपात, ही जातपात निर्माण केली स्वत:च्या स्वार्थासाठी ह्या पुढाऱ्यांनी.

प्रश्न : काही लोक फक्त केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी जातीपातीचं राजकारण करत आहेत असं तुम्हाला वाटतं का?  

उदयनराजे भोसले : नाही तर काय?, चर्चेला मला कुठेही बोलवा... मी व्यासपीठावर उत्तरं देईन. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला सांगा कारण नसताना शेतकऱ्यांचं दीड ते दोन हजार कोटींचं नुकसान झालं. लोकं आता यावर थांबणार नाही. उद्या तुम्ही गाड्या-घोड्या घेऊन संपूर्ण शहरात राहतात. उद्या समजा ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटला तर किती महागात पडेल आणि कशाकरता?

VIDEO :



संंबंधित बातम्या :

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण

कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार


वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी


भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन