भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ झालेल्या बस अपघातात आतापर्यंत 47 प्रवाशांचा मृतदेह हाती लागला आहे. पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. मंगळवारी हा अपघात झाला असून चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे.


हा अपघात सिधी जिल्ह्यातील रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ असलेल्या पटना या गावात झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस सरळ कालव्यात गेली. या बसमधून 55 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास 30-35 विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातात काही जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप पाच जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.


MP Bus Accident: मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली, 30 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सिधी बस अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे.





एका प्रवाशाने सांगितलं की प्रवास करताना बसचा वेग हा जास्त होता. त्यामुळे चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि बस सरळ कालव्यात गेली. बस कालव्यात जात असताना चालकाने बसबाहेर उडी मारली आणि तो पसार झाला. इतर लोकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले. काही लोकांनी या बसच्या काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तेही अपयशी ठरले.


प्रवास करताना ही बस खचाखच भरली होती असं सांगण्यात येतंय. बसमधून किमान 55 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये अर्ध्याहून अधिक प्रवासी हे विद्यार्थी होते, ते परीक्षा देण्यासाठी सतना शहराकडे निघाले होते.


या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आणि तात्काळ बचाव कार्याचे आदेश दिले. सुरुवातीला 30 प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत होती. नंतर हा आकडा वाढून 47 वर पोहचला आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


'सम्मान के चक्कर में क्या से क्या हो गया देखते देखते', कॉंग्रेसची ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका