नवी दिल्ली : एअर इंडिया आणि इतर हवाई वाहतूक कंपन्यांनी बंदी हटवल्यानंतरही शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी ट्रेनलाच पसंती दिली आहे. खासदार रवींद्र गायकवाड हे दिल्लीहून राजधानी एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.


जवळपास दोन आठवड्यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी हटवण्यात आली. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला. मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

भारतीय विमान संघाची बंदी

भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली . जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली . भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत

– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.

– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत

– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.

– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.

– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.