Chinese Nationals In India : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांनी भारत सोडण्याची नोटीस दिल्याची माहिती  केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी आज संसदेत दिली आहे.  तर 117 लोकांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे.


संसदेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना  नित्यानंद राय  म्हणाले, 2019  ते 2021 या कालावधीत 81 चिनी नागरिकांना देश सोडण्याचे नोटिस दिले. तर 117 चिनी नागरिकांना हद्दपार केले आहे.  व्हिसाच्या अटींचे उल्लंघन आणि इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 726 लोकांना प्रतिकूल यादीत ठेवण्यात आले आहे. सरकार अशा परदेशी नागरिकांचे रेकॉर्ड ठेवते. ज्यामध्ये चिनी नागरिकांचा देखील समावेश आहे. जे वैध कागदापत्रांसह देशात प्रवेश करतात.


भारतात  नोकरी, पर्यटन किंवा इतर काही कामसाठी नागरिक येतात. यातील बहुतांश नागरिक हे  व्हिसा नियमांचे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.  त्यांना आधी नोटीस दिली जाते आणि त्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.  भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर लोकांवर सरकार सातत्याने कारवाई करत आहे.


केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय   (Nityanand Rai) म्हणाले, बेकायदेशीररित्या देशात आढळल्यास  विदेशी अधिनियम 1946 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.  ज्यामध्ये परदेशी नागरिकांना देश सोडण्याचे नोटिस जारी करणे आणि विझा शुल्क आकारणे यासारख्यांचा समावेश आहे.