नवी दिल्ली : भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मोदी सरकारने मास्टरप्लॅन आखला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मोदी सरकारमधले मंत्री देशातल्या 150 ठिकाणी भेटी देणार आहेत. अशाप्रकारे पंतप्रधानांनी प्रथमच देशाच्या जनतेकडून भाषणासाठी सूचना मागवल्या आहेत.


 

स्वातंत्र्यदिन एखाद्या सणासारखा साजरा व्हावा म्हणून हे सेलिब्रेशन असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच आठवडाभर सरकारचे विविध कार्यक्रम चालणार आहेत. 9 ऑगस्टपासून त्याची सुरूवातही झाली असून पुढचा आठवडाभर हे सर्व कार्यक्रम चालणार आहेत.

 

या मास्टरप्लॅन अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जालियनवाला बागेत उपस्थित राहणार तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर अंदमानच्या सेल्यूलर जेलला भेट देणार आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दांडी यात्रेच्या ठिकाणी तर नितीन गडकरी बेगुसरायमधल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जन्मस्थळी उपस्थित राहणार आहेत. स्मृती इराणी सियाचिनच्या बॅटल फिल्डवर उपस्थित राहणार असून तर अनुप्रिया पटेल राजस्थानच्या सीमेवर भेट देणार आहेत. तसंच रक्षाबंधनाला एखादी महिला मंत्री सीमेवर जाणार आहे.

 

23 ऑगस्टला 11 वाजता देशातील 15 लाख शाळांमध्ये विद्यार्थी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हणतील आणि याच दिवशी या सोहळ्याची सांगता होईल.