श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये एकीकडे भारतीय सैन्य दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं अभियान करत असताना, दुसरीकडे इथे भाजपच्या साथीने सरकार चालवणाऱ्या पीडीपीच्या एका आमदाराने या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं आहे.


काश्मीरचे दहशतवादी शहीद असून ते आमचे भाऊ आहे. यापैकी काही जण तर अल्पवयीन आहेत. आपण काय करतोय हे त्यांना माहितही नसतं. अतिरेक्यांच्या मृत्यूवर आपण जल्लोष साजरा करायला नको. ते काश्मीरचे रहिवासी आहेत, असं पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर म्हणाले.

एजाज अहमद मीर यांच्या या विधानानंतर पीडीपीसोबत भाजपच्या युतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे आपलं सामूहिक अपयश
सध्या जम्मू-कश्मीर विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी मीडियाशी बोलताना एजाज अहमद मीर म्हणाले की, "दहशतवाद्यांच्या मृत्यूवर आपल्याला आनंद साजरा करायला नको. हे आपलं सामूहिक अपयश आहे. जेव्हा सुरक्षा दलाचे जवान शहीद होतात, तेव्हा मला दु:खं होतं. आपण जवान आणि दहशतवाद्यांच्या कुटुंबाचं करायला हवं."

अतिरेकी काश्मीरचे शत्रू : मुख्तार अब्बास नक्वी
'अतिरेकी आणि फुटीरतावादी हे काश्मीर, काश्मिरी, शांतता आणि विकासाचे शत्रू आहेत. त्यांच्यासोबत असंच व्हायला हवं. ते कसे काय कोणाचे भाऊ असू शकतात?, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे.