नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये 27 फेब्रुवारी रोजी Mi-17 हेलिकॉप्टरचा अपघात ही हवाई दलाचीच चूक होती, अशी कबुली एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी दिली. बडगाम अपघाताबाबत हवाई दलाई पहिल्यांदाच अधिकृत भाष्य केलं आहे. हवाई दलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी बालाकोट एअरस्ट्राईकचा व्हिडीओ जारी केला, तसंच बडगाम अपघाताचीही माहिती दिली.


आरकेएस भदौरिया म्हणाले की, "बडगाम अपघात आमचीच चूक होती. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमधून समोर आलं की, Mi 17 हेलिकॉप्टर आमच्याच क्षेपणास्त्राशी धडकलं होतं. दोन अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. मृत्युमुखी पडललेले जवान हे युद्धबळी समजले जातील."

संबंधित बातम्या

कधी झाला होता बडगाम अपघात?
27 फेब्रुवारीच्या सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. त्याला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात होतं. त्याचवेळी श्रीनगर एअरबेसमधून उड्डाण केलेल्या  Mi-17 विमानाचा बडगाममध्ये अपघात झाला. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. भारतीय हवाई दलाच्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या स्पायडर क्षेपणास्त्राने चुकीने आपल्याच Mi-17 विमानाचा वेध घेतला, असं कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये समोर आलं. या अपघाताला ग्रुप कॅप्टनसह चार अधिकासाठी जबाबदार असल्याचं कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये स्पष्ट झालं.

पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राईक
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून एअरस्ट्राईक केला होता. या एअरस्ट्राईकमध्ये हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. त्याचाच व्हिडीओ हवाई दलाने आज जारी केला.