नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाचा सायबर सेफ देशात डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश करण्यासाठी व्यापकपणे काम करत आहे. एकीकडे डिजिटल फसवणूक उघडकीस येत असताना, दुसरीकडे डिजिटल पेमेंटस सुरक्षित केले जात आहेत. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे देशातील 18 राज्यांमध्ये फसवणुकीच्या टोळ्या उघडकीस आल्या आहेत.


यापूर्वी 11 जून रोजी उदयपूर येथे राहणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक झाली होती. झारखंडमध्ये बसून या गुन्हेगाराने हा फ्रॉड केला होता. गृहमंत्रालयाच्या एफकॉर्ड (FCord) संचलित सायबर सेफ अ‍ॅपने सांगितले की, हे पैसे एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये जमा झाले आहे. या कार्ड्सच्या मदतीने फ्लिपकार्ट वरून चिनी बनावटीच्या शिओमी, पोको एम 3 हे मोबाइल फोन खरेदी करण्यात आले.




मध्य प्रदेशातील बालाघाटच्या पत्त्यावर हे फोन आले होते. याची माहिती मिळताच बालाघाटचे एसपींना कळवण्यात आले. यानंतर मध्य प्रदेशच्या पोलिसांनी मास्टरमाईंडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 33 नवीन फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. फोनवरुन फसवणूक करणार्‍या टोळीने प्रत्येक फोन 10,000 रुपयांना खरेदी केला होता, हे फोन ही टोळी 5-10 टक्के सूट देऊन काळ्या बाजारात विकणार होते. झारखंड पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


या टोळीतील शेकडो ऑपरेटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करत आहेत. यात ओटीपी मागवून फसवणूक, काही ई-कॉमर्स फ्रॉड आणि काही क्रेडिट कार्ड फ्रॉड अशा वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवत आहेत. आतापर्यंत 8 फ्रॉड-टू-फोन मास्टरमाइंड लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2 मध्य प्रदेशातील, 4 झारखंड आणि 2 आंध्र प्रदेशातील आहेत. आणि फसवणूक झालेल्या पैशातून खरेदी केलेले सुमारे 300 नवीन फोन जप्त करण्यात आले आहेत.


या कारवाईत या टोळीचे सुमारे 900 सेल फोन आणि 1000 बँक खाती आणि शेकडो यूपीआय आणि ई-कॉमर्स आयडी समोर आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यातील सुमारे 100 बँक खाती आणि डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रिज करण्यात आले आहेत. फोन टोळीशी संबंधित फसवणुकीविरोधात हे ऑपरेशन 18 राज्यात कार्यरत आहे. यात 350 लोक काम करत असल्याची माहिती आहे.