दरम्यान एमजे अकबर राजीनामा देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करु शकतं. तर वैयक्तिक कारणं देऊन एमजे अकबर राजीनामा देऊ शकतात. तसंच अकबर भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एमजे अकबर यांच्यावरील आरोपांनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सरकार आणि पक्षाचे वरिष्ठ अधिकारी अकबर यांच्या भविष्याबाबत विचार करतील. तर त्यांचं स्पष्टीकरणही महत्त्वाचं असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार केला जाईल. विचार न करता कोणताही निर्णय आम्हाला घ्यायचा नाही. ही महिला सुरक्षेशी संबंधित बाब आहे, जी पंतप्रधानांसाठी महत्त्वाची आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
#MeToo : कॉमेडियन अदितीने बळजबरीने चुंबन घेतल्याचा कनीझचा दावा
#MeToo चं वादळ
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.