मुंबई : ही गोष्ट आहे एका वैमानिकाची... युद्धभूमीवर पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या एका वैमानिकाची... शत्रूच्या तावडीत सापडलेल्या, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागलेल्या, पण मायदेशी सुखरुप परत आलेल्या एका वैमानिकाची...


ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची... कारगील युद्धातल्या एकमेव युद्धकैद्याची. त्या वैमानिकाचं नाव कम्बम्पती नचिकेता अर्थात के नचिकेता.

नचिकेता त्यावेळी फ्लाईट लेफ्टनंट होते. 'ऑपरेशन सफेद सागर' सुरु होतं. अवघ्या 26 वर्षांचे नचिकेता आपलं मिग-27 घेऊन त्यात सहभागी झाले होते.

17 हजार फूट उंचीवरच्या बटालिक सेक्टरमध्ये शत्रूंवर 80 मिमीचे रॉकेट बरसवणं हे त्यांचं मिशन होतं. 27 मे 1999 चा तो दिवस होता. नचिकेता शत्रूवर हवेतून बॉम्बवर्षाव करत होते. तितक्यात त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. आगीने पेट घेतलेलं त्यांचं विमान पाकव्याप्त काश्मिरमधल्या स्कार्दु भागात कोसळलं.

नचिकेता विमानाबाहेर पडले पण पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडले. नचिकेता यांना सोडवायला आलेलं दुसरं विमान पाकिस्तानने पाडलं. त्याचे वैमानिक अजय आहुजा त्यात शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी नचिकेता यांना तिथेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पाक वायुसेनेच्या कैसर तुफैल या अधिकाऱ्याने मध्ये पडत परिस्थितीची जाणीव करुन दिली.

नचिकेता यांचा जीव वाचला, मात्र लष्कराच्या ताब्यात पुढचे तीन-चार दिवस रावळपिंडी जेलमध्ये नचिकेता यांचा अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला. मरण बरं वाटावं असं थर्ड डिग्री टॉर्चर त्यांना सहन करावं लागलं.

VIDEO | 1972 च्या युद्धातील ग्रुप कॅप्टनकडून ऐका युद्धाचा थरार



कारगील युद्धाच्या सुरुवातीलाच भारतीय लष्कराचे कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विटंबना केलेले मृतदेह हाती आले होते. पाकिस्तानी सेनेचा क्रूर चेहरा जगासमोर आला होता, त्यामुळेच त्यांच्या तावडीत सापडलेल्या कॅप्टन नचिकेता यांचं काय होणार ही चिंता सर्वांनाच होती.

भारताने नचिकेता यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. भारताचे पाकिस्तानातील तत्कालीन उच्चायुक्त पार्थसारथी यांच्या माध्यमातून मुत्सद्देगिरीची शर्थ केली. पाकिस्तानला सतत जीनिव्हा कराराची आठवण करुन दिली. तोवर नचिकेता यांच्या सुटकेसाठी जगभरातून मोठा आक्रोश सुरु झाला होता, पाकिस्तानवर तो दबाव सुद्धा वाढत होता.

गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात

अखेर पाकिस्तानने नचिकेता यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरिफ यांनी नचिकेता यांच्या सुटकेची घोषणा करत रेड क्रॉसकडे सोपवलं.

तब्बल आठ दिवसांनंतर नचिकेता यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली. तीन जून रोजी नचिकेता वाघा बॉर्डरच्या मार्गाने भारतात परतले.

दरम्यान, पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका होणार आहे. अभिनंदन वर्धमान उद्या पाकिस्तानातून मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत ही घोषणा केली. भारताचं मिग 21 बायसन बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं.