नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 सप्टेंबर रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशभरात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. याबाबत ते आज बोलण्याची शक्यता आहे. तसंच देशभरात कृषी विधेयकांवरुन होत असलेल्या विरोधावर देखील ते भाष्य करतील अशी शक्यता आहे.


डिसलाईकमुळे गेल्या मन की बातची चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.


गेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी शेतकरी बांधवांचं कौतुक केलं होतं. शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.


कोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत. मात्र अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, असं मोदी यांनी म्हटलं होतं. देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, असंही ते यावेळी म्हणाले होते.


त्याआधीच्या मन की बातमध्ये कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, असंही मोदी म्हणाले. कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 69 वी मन की बात आहे.