नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 25 ऑक्टोबर रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छांसह कोरोना लस तसेच देशातील महिला अत्याचारांच्या घटनांवर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 27 सप्टेंबरच्या मन की बात मध्ये शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेवर भाष्य केलं होतं. देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत.  मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे,  मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असं मोदी म्हणाले होते.


डिसलाईकमुळे मन की बातची चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.


त्याआधीच्या मन की बातमध्ये कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, असंही मोदी म्हणाले. कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 70 वी मन की बात आहे.