नवी दिल्ली : श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून दिला आहे. हरियाणातील हिंसाचारावर बोलताना मोदींनी चिंताही व्यक्त केली.


दोषींना कायदा कडक शिक्षा सुनावेल, मात्र श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात पंतप्रधानांनी नागरिकांना खडे बोल सुनावले. भारत हा महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांचा देश आहे. देशात कुठल्याही स्वरुपातील हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असं मोदी म्हणाले.

एकीकडे देशात उत्सवाचं वातावरण असताना हिंसाचाराच्या घटना समोर आल्याने मन व्यथित झाल्याचं मोदी म्हणाले.

मोदींनी देशभरातील स्वच्छता, क्रीडा, शिक्षण आणि सरकारच्या विविध योजनांवर भाष्य केलं. 2 लाख 30 हजार गावं हागणदारीमुक्त झाल्याचं मोदींनी सांगितलं. गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून स्वच्छतेला सुरुवात करण्याचं आवाहनही मोदींनी यावेळी केलं.