'भारतीय आहेस?' मणिपुरी तरुणीची विमानतळावर अडवणूक
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 02:43 PM (IST)
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मणिपुरी युवतीशी अधिकाऱ्यांना मुजोर वर्तन केल्याचा आरोप होत आहे. मणिपूरच्या मोनिका खंगेम्बम यांच्या तक्रारीची दखल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी 'तू नक्की भारतीय आहेस का?' असा प्रश्न विचारल्याचा दावा मोनिका यांनी केला आहे. इतकंच नाही तर 'भारतीय असल्यास सगळ्या राज्यांची नावं सांग' असा प्रश्न विचारल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. फ्लाईटला उशीर होत असतानाही अधिकाऱ्यांनी आपली अडवणूक केल्याचं त्यांनी म्हटलंय. उशीर झाल्यास आपली फ्लाईट चुकेल, असं मोनिका यांनी सांगताच, 'तुला घेतल्याशिवाय विमान जाणार नाही. वेळ घे आणि सांग मणिपूरशी किती राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत,' असं एका महिला अधिकाऱ्याने विचारल्याचंही त्या म्हणतात. मोनिका यांनी आपला हा अनुभव फेसबुकवर शेअर केला. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सरकारलाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. 'आपण अहवाल मागवला असून कारवाई करण्यात येईल.' असं आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रीजिजू यांनी दिलं आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही मोनिका यांची माफी मागत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी या प्रश्नी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. https://twitter.com/SushmaSwaraj/status/752189334397161472 https://twitter.com/SushmaSwaraj/status/752189978600304645