Maharashtra ST Bus Accident : मध्य प्रदेशातील इंदूर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) दिली. बस दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. नदी पात्रातून आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदूर-अमळनेर बस क्रमांक एमएच-40 N-9848 ही आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास इंदूर येथून अमळनेरसाठी रवाना झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर एसटी बस अपघातग्रस्त होवून नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत. अजूनही शोधमोहिम सुरु असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. हा अपघात अत्यंत दुर्देवी असून असे प्रसंग टाळण्यासाठी महामंडळातर्फे उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले.


दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे:


1.चंद्रकांत पाटील - वय 45 (चालक)
2. प्रकाश चौधरी (वाहक)
3. अविनाश परदेशी
4 राजू तुलसीराम - वय 35, 
5. जगन्नाथ जोशी - वय 68 
6. चेतन जागीड 
7. लिम्बाजी खाती 
8. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा 
9. कल्पना पाटील - वय 57  
10. विकाश बेरहे - वय 33
11. आरवा मुर्ताजा बोहरा -वय  27
12. रुख्मणीबाई जोशी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहीर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीच्या पुलावर झालेल्या अपघाताच्या घटनेवर दु:ख  व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याशिवाय, या अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीदेखील अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मध्य प्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली.