Panipat Shaurya Din : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हरियाणातील पानिपतला (Panipat) जाण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी रोजी पानिपतमध्ये आयोजित शौर्यदिनाच्या (Shaurya Din) कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतं. 14 जानेवारी रोजी हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचं जागर केला जाईल. त्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आलं आहे. शौर्य स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी हरियाणा राज्याचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, विनोद तावडे, राहुल शेवाळे यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 


....तर एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला हजर राहणारे पहिले मुख्यमंत्री ठरतील!


1761 मध्ये पानिपतमध्ये झालेल्या लढाईचा शौर्य दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे. पानिपतमधील काला आम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार येतो. या वर्षाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले तर हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरतील. याआधी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना शौर्यदिनाच्या कार्यक्रमला हजर राहिल्या होत्या. 


एकनाथ शिंदे धाडस करुन बलिदान करणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत : प्रदीप पाटील


या कार्यक्रमाचे संयोजत प्रदीप पाटील म्हणाले की, "महाराष्ट्र आणि पानिपतचं नातं अतिशय जवळचं आहे. 1761 ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं. त्या युद्धात महाराष्ट्रातले लाखो सैनिक शहीद झाले. असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातली बांगडी फुटली. त्या युद्धात वीरमरण आलेल्या मराठे हिंदुस्तानच्या सीमेसाठी लढले होते. 1761 ला जे युद्ध झालं त्याची 262वी वर्षपूर्ती 14 जानेवारी 2023 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल बंडारु दत्तात्रय आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हजर राहणार आहेत. 2012 मध्ये या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. आतापर्यंत खेद होता की महाराष्ट्राचे कोणतेही मुख्यमंत्री आतापर्यंत इथे आले नव्हते. मात्र एकनाथ शिंदे यांनी धाडस करुन देशासाठी बलिदान केलं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातून दोन हजार जण येत आहेत. रेल्वे मंत्रालयाने पाच ते सहा ट्रेनला एक्स्ट्रा कोच लावले आहेत. दिल्लीतील यूपीएससीतील 600 ते 700 मुलं आणि इतर वर्गातील असे मिळून हजार ते दीड हजार मुलं येणार आहेत. तर पानिपतच्या भूमीवर 15 ते 20 हजार लोक जमा होतील.