चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावेळी दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मद्रास हायकोर्टानेच सवाल उपस्थित केला आहे. जयललितांच्या मृत्यूबाबत आम्हालाही शंका आहे, त्यामुळे गरज पडल्यास चौकशीसाठी जयललितांचं पार्थिव पुन्हा खोदून बाहेर का काढू शकत नाही? असे सवाल स्वत: हायकोर्टाने विचारले आहेत. जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मद्रास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि न्यायमूर्ती पार्थिबान यांच्या खंडपीठाने हे प्रश्न उपस्थित केले.
याप्रकरणी न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. जयललिता या रुग्णालयात होत्या तेव्हापासून त्यांच्या आजाराबाबत गुप्तता पाळण्यात आली. मात्र त्यांच्या आजाराबाबत इतकी गुप्तता का असे प्रश्न माध्यमातून उपस्थित राहू लागले. त्याचाही दाखला कोर्टाने दिला.
"माध्यमांनी जयललितांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत,
मला सुद्धा याबाबत शंका आहे" असं न्यायमूर्ती वैद्यनाथन यांनी म्हटलं.
जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबतची याचिका त्यांच्याच AIDMK पक्षाचा कार्यकर्ता पी ए जोसेफने केली आहे. याप्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी, त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा, अशी मागणी जोसेफ यांनी केली आहे. दरम्यान, आजच AIDMK ने शशिकला नटराजन यांची जयललितांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शशिकला यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
जयललितांचं निधन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं 5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. जयललितांना उपचारासाठी 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 4 डिसेंबरला त्यांना ‘कार्डिअॅक अरेस्ट’ आल्यामुळे त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक होती.
संबंधित बातम्या