चेन्नई : शशिकला नटराजन यांची AIADMK पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK ची पहिली जनरल काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.


चेन्नईत AIADMK पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी शशिकला यांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं.

जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK पक्षाची पहिली महत्त्वाची बैठक झाली. पक्षाचे सर्व मोठे नेते आणि जनरल काऊन्सिलचे सदस्य बैठकीत सहभागी होते. मधूसुदनन यांनी बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं.

तामिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांमधील AIADMK पक्षाच्या सचिवांनाही या बैठकीत बोलावण्यात आले होते. त्याचसोबत तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम, सर्व कॅबिनेट मंत्री, एम. थंबीदुरई आणि पक्षाचे आमदारही बैठकीला हजर होते.

दरम्यान, पन्नीरसेल्वम यांनी काही दिवसांआधीच सरचिटणीसपदासाठी शशिकला यांच्या नावाची शिफारस केली होती. शशिकला जनरल काऊन्सिल बैठकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधून संदेश देण्याची शक्यता आहे.

जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण?


 

शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची…



आजवर पडद्याआड वावरणारी शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे.

शशीकला आणि जयललितांची ओळख कशी?

1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या
निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली.

एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले….एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं.

जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली….पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे.

शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली.

बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली.

जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं की भविष्यात सगळा कारभार शशीकलाकडेच असणार…फक्त ती किंगमेकरची भूमिका पसंत करणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार इतकाच प्रश्न होता. तूर्तास तरी तिनं पनीरसेल्वम यांना
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशीकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाहीत. शिवाय जो करिष्मा, लोकप्रियता, लोकल टच जयललितांचा होता, तितका शशीकलाचा नाही. त्यामुळे ती किती घट्टपणे पक्षावर आपली कमांड ठेवू शकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

शशीकला पुष्पा नावाची आणखी एक डीएमके खासदार आहे. तिच्यासोबत नुकतंच भांडण झालेलं आणि तिला हाकलून दिलं होतं. मात्र त्या शशीकलाचा याच्याशी काहीही संबंध नाही.