विजयवाडा : नोटाबंदीला एक महिना उलटल्यानंतरही अद्याप देशात सामान्य माणसांची गैरसोय होणं आणि व्यवहार कोलमडणं सुरुच आहे. त्यामुळे मोदी सरकारमधील सहकार पक्षही आता निर्णयाविरोधात बोलू लागल्याचे दिसून येते आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सुरुवातीपासूनच नोटाबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं होतं. मात्र, आता इतक्या दिवसानंतरही नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करता येत नसल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

नोटाबंदीचं समर्थन करणाऱ्या चंद्राबाबू नायडूंनी आपली भूमिका बदलली आहे. चंद्राबाबू म्हणाले, “नोटाबंदीच्या इतक्या दिवसांनंतरही अडचणी तशाच आहेत. अडचणी सोडवणारे योग्य नाहीत आणि सध्या या अडचणींवर मात करता येईल, असेही वाटत नाही.”

चंद्राबाबू नायडू यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या स्थितीचं निरीक्षण करणाऱ्या 13 सदस्यीय समितीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आहेत.

चंद्राबाबू यांनी सरकारला इशारा दिला आहे की, नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या स्थितीवर आणि अडचणींवर वेळीच पावलं उचलली नाहीत, तर मोठा कालावधीसाठी लोकांना या अडचणींचा समाना करावा लागेल.”

“नोटाबंदीचा निर्णय जसा मला वाटला होता, तसा नाहीय. नोटाबंदीच्या 40 दिवसांनंतरही लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि सध्यातरी यावर कोणताच उपाय दिसून येत नाहीय.”, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. शिवाय, नोटाबंदी आजही संवेदनशील आणि किचकट अडचण आहे, असेही चंद्राबाबू म्हणाल. टीडीपीचे खासदार आणि आमदारांच्या शिबिरात ते बोलत होते.

चंद्राबाबू यांनी सांगितले की, रोज दोन तास नोटाबंदीशी संबंधित अडचणींवर उपाय  शोधण्यात घालवतो. मात्र, तरीही काहीच उपाय सापडत नाही.

“आम्ही 1984 साली पक्षाअंतर्गत झालेल्या उलथापालथीमुळे निर्माण झालेल्या संकटावर 30 दिवसात उपाय शोधला होता. मात्र, नोटाबंदीवर उपाय शोधताना नाकीनऊ येत आहेत.”, असे चंद्राबाबू म्हणाले. शिवाय, नोटाबंदी आणि डिजिटल ट्रान्झॅक्सनसाठी बँका तयार नव्हत्या, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 12 नोव्हेंबरला पत्र लिहून चंद्राबाबू यांनी मोदींच्या निर्णयाची स्तुती केली होती.