Indian Journalist Turned Politicians :  कायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेसोबत माध्यम किंवा पत्रकारिता हा लोकशाहीचा स्तंभ मानला जातो. देशात लोकशाही टिकवणे, ती वाढवणे, घटनेनुसार राज्य चालतंय का ते पाहणे, आणि अन्यायाविरोधात उभं राहणं हे माध्यमांकडून अपेक्षित असतं. या माध्यमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून नंतर यातील काही पत्रकार हे राजकारणात यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आपल्या पत्रकारितेतील ज्ञानाचा फायदा राजकारणामध्ये करुन त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. कुमार केतकर हे त्यापैकीच एक. 


कुमार केतकर यांच्यासह इतर नऊ पत्रकार असे आहेत, ज्यांनी राजकारणात येऊन चांगलं नाव कमावलं आहे, जे यशस्वी राजकारणी झाले आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात, 


Kumar Ketkar : कुमार केतकर


लोकसत्ता आणि दिव्य मराठीचे माजी संपादक आणि लेखक अशी कुमार केतकर यांची ओळख. द इकॉनॉमिक टाइम्समधून त्यांनी आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली होती. ते लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राचे मुख्य संपादकही राहिले आहेत. कुमार केतकर यांनी द ऑब्झर्व्हर आणि महाराष्ट्र टाइम्समध्येही काम केले आहे. कुमार केतकर हे भाजप, आरएसएस आणि शिवसेनेचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. 12 मार्च 2018 रोजी त्यांना महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली.


M J Akbar: एम जे अकबर 


नरेंद्र मोदी सरकारमधील माजी राज्यमंत्री, एम जे अकबर हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत जे अनेक इंग्रजी वृत्तपत्रांच्या संपादकपदी काम केलं होतं.  पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत, अकबर यांनी 1976 मध्ये भारतातील पहिले साप्ताहिक राजकीय वृत्तपत्र Sunday आणि 1989 आणि 1994 मध्ये द टेलिग्राफ आणि द एशियन एज ही दोन दैनिक वर्तमानपत्रे सुरू केली.


इंडिया टुडे आणि द संडे गार्डियन या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादकीय संचालक होते. इंडिया टुडे, हेडलाईन्स टुडे, द टेलिग्राफ, द एशियन एज आणि डेक्कन क्रॉनिकल या इतरांबरोबर ते संबंधित आहेत.


1989 मध्ये ते बिहारच्या किशनगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आले. 1991 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केलं आणि जुलै 2015 मध्ये झारखंडमधून राज्यसभेवर निवडून आले. जुलै 2016 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला.


मी टू (Mee Too) प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


Arun Shourie : अरुण शौरी


भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले अरुण शौरी यांनी इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी काम केलं आहे. त्यांना 1998 मध्ये उत्तर प्रदेशमधून भाजपने राज्यसभेचे खासदार म्हणून संधी दिली केले आणि 2010 पर्यंत त्यांना राज्यसभेवर कायम ठेवण्यात आलं. अरुण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री होते. त्यांच्याकडे निर्गुंतवणूक मंत्रीपदही होते. अलीकडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका करत आहेत.


Rajeev Shukla : राजीव शुक्ला


ज्येष्ठ हिंदी पत्रकार आणि टीव्ही अँकर अशी राजीव शुक्ला यांची ओळख होती. सध्या ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. एक्सप्रेस ग्रुपचे हिंदी दैनिक जनसत्ता आणि संडे मासिकासाठी त्यांनी काम केलं.


राजीव शुक्ला यांनी 90 च्या दशकाच्या मध्यापासून ते 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत लोकप्रिय टीव्ही इंटरव्ह्यू शो रुबारू होस्ट केले. राजीव शुक्ला यांनी 2001 मध्ये नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. नरेंद्र मोदी ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांची ही क्लिप 2016 मध्ये व्हायरल झाली. नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणासंबंधी माहिती या क्लिपमध्ये होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती मागणारी आरटीआय क्वेरी दाखल केली होती. राजीव शुक्ला यांना 2000 मध्ये राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


Chandan Mitra : चंदन मित्रा


चंदन मित्रा यांनी कोलकाता येथील द स्टेट्समनचे सहाय्यक संपादक म्हणून सुरुवात केली. नंतर ते दिल्लीतील टाइम्स ऑफ इंडिया आणि नंतर द संडे ऑब्झर्व्हरमध्ये गेले. या ठिकाणी त्यांनी संपादक म्हणून काम केलं. त्यानंतर ते हिंदुस्तान टाइम्समध्ये कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाले. नवी दिल्लीतील द पायोनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 
2003 मध्ये त्यांना राज्यसभेवर नामांकन देण्यात आले आणि जून 2010 मध्ये मध्य प्रदेशमधून भाजप खासदार म्हणून त्यांना आणखी एक टर्म मिळाली.


Shazia Ilmi : शाझिया इल्मी


पूर्वी दूरदर्शन पत्रकार आणि स्टार न्यूजच्या अँकर शाझिया इल्मी यांनी टेलिव्हिजन बातम्या आणि माहितीपट निर्मिती क्षेत्रात 15 वर्षे घालवली. 2011-12 मध्ये त्यांनी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीत भाग घेतला आणि नंतर आम आदमी पार्टीमध्ये सामील झाल्या. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये पक्षाच्या नेतृत्वाशी झालेल्या वादानंतर त्यांनी आपचा राजीनामा दिला होता.16 जानेवारी 2015 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


Ashutosh : आशुतोष


आशुतोष म्हटलं तर सर्वाच्या समोर पहिलं चित्र येतं, आणि ते म्हणजे आज तक आणि नंतर IBN7 वर टीव्हीवरचे न्यूज अँकर. त्यांची अँकरिंगची विशेष शैली आजही अनेकांना आठवते. आशुतोष यांनी 2014 मध्ये आपमध्ये प्रवेश केला आणि  लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यामध्ये ते पराभूत झाले.


Manish Sisodia : मनीष सिसोदिया


सध्या चर्चेत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेचा पदविका पूर्ण केली आणि दिल्लीजवळील पिलखुवा येथून पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.1997 ते 2005 पर्यंत त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आणि टीव्ही न्यूजरीडर म्हणून काम केले. अण्णा हजारेंच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. आज दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत. 


Ashish Khetan : आशिष खेतान 


'तहलका' पत्रकार म्हणून आशिष खेतान हे त्यांच्या शोध पत्रकारितेसाठी ओळखले जातात. 2007 साली त्यांनी स्टिंग ऑपरेशन्सवर आधारित 2002 च्या गुजरात दंगलीवरील 'द ट्रुथ: गुजरात 2002' (The Truth: Gujarat 2002) वर त्यांचा अहवाल प्रकाशित केला. नरोडा पाटिया हत्याकांडातील भूमिकेसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी हे या टेपमध्ये दाखविण्यात आले होते. आशिष खेतान यांनी नंतर गुलाईल नावाचे स्वतःचे शोध पत्रकारिता पोर्टल स्थापन केले. 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.